पत्रकारांच्या प्रश्नावर यशवंत पवार आक्रमक
सोलापूर (प्रतिनिधी) - पत्रकार सुरक्षा समितीचे वतीने गेल्या आठ वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना, यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, राज्यातील पत्रकारांचे शासन दरबारात नोंदणी, राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता, ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास इत्यादी विषयावर पत्रकार सुरक्षा समितीचे वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा पत्रकार सुरक्षा समिती सातत्याने प्रयत्न करत आहे. पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका नेहमीच उदासीन राहिली असून पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार संवेदनाहीन असून पत्रकारांच्या त्यागाचा राज्य सरकारला विसर पडला काय? असा जळजळीत सवाल देखील प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्य सरकारला विचारला असून पत्रकारांना संघर्ष केल्याशिवाय काहीच हाती मिळणार नाही. त्यासाठी पत्रकारांनी एकत्र यायला हवं.
महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात पत्रकारांना एकत्र आणून पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती वतीने आझाद मैदान (मुंबई ) या ठिकाणी लवकरच आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी प्रसार माध्यमाना दिली असून जोपर्यंत महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे मूलभूत प्रश्न राज्य सरकार सोडवत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही देखील राज्यातील पत्रकारांना दिली आहे.

