मराठी भाषेला समृद्ध ज्ञान वारसा लाभल्यामुळेच ती अभिजात ठरली आहे - डॉ. कृष्णा इंगोले

0
केबीपी महाविद्यालयात अभिजात भाषा सप्ताहनिमित्त व्याख्यान संपन्न

           पंढरपूर (प्रतिनिधी) - “मराठी ही समृध्द ऐतिहासिक वारसा असणारी ज्ञान भाषा आहे. भाषा हे संपूर्ण मानवी व्यवहाराचे साधन असते. तसेच विचार, भावना आणि संवेदना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम भाषाच असते. मातृभाषा ही आपल्या काळजाची भाषा असते. अभिजात भाषा म्हणजेच दर्जेदार भाषा होय. मराठी ही श्रेष्ठ भाषा असून महाराष्ट्रामध्ये ती अडीच हजार वर्षापासून सलगपणे चालत आली आहे. चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, तुकाराम,  नामदेव, एकनाथ, जनाबाई आदी संत मंडळीनी मराठी भाषेला अधिक उन्नत बनविले. मराठी ही महाराष्ट्री प्रकृतापासून आली असून आज जगभरामध्ये बारा ते चौदा कोटी  लोक मराठी भाषा बोलतात. याच बरोबर जगभरातील भाषेमध्ये मराठी ही दहाव्या क्रमांकाची महत्त्वाची भाषा आहे. ” असे विचार ज्येष्ठ अभ्यासक प्रा. कृष्णा इंगोले यांनी व्यक्त केले. ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मराठी विभाग व महाराष्ट्र राज्य विश्वकोश विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डाॅ.दत्ता घोलप, लेखक श्री.शहाजी बलवंत, म.सा.प. पंढरपुर शाखेचे  श्री.कल्याणराव शिंदे, श्री.अशोक माळी, उपप्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे, डाॅ.सुशील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
             प्रारंभी महाराष्ट्र विश्वकोश मंडळाचे सहायक संपादक डाॅ. दत्ता घोलप यांनी प्रास्ताविकामध्ये  विश्वकोश मंडळाचे कार्य व विश्वकोशाच्या लेखनाची समृद्धता व्यक्त केली व कोशलेखनाच्या नव्या दृष्टिकोनाविषयी सविस्तर मांडणी केली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.बाळासाहेब बलवंत म्हणाले की, “आपली मातृभाषा मराठी असल्याचा आपल्या  सर्वाना अभिमान आहे. मराठी भाषा समृध्द करण्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले आहे. आपली मातृभाषा अधिकाधिक समृध्द करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असणे महत्त्वाचे आहे.”
       पाहुण्यांचा परिचय व स्वागत  मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ. रमेश शिंदे यांनी करून दिला. यावेळी आभार प्रा.हरिभजन कांबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.सारिका भांगे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागातील प्रा. डाॅ.दत्ता डांगे, प्रा.बापूसाहेब घोडके, प्रा. अंकुश घुले, प्रा. मोहिनी सावंत यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, साहित्यप्रेमी तसेच शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)